चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम देशमुख अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या “बालमेळावा” अध्यक्षपदी घोषित

बाल उद्घाटक म्हणून जळगावची कु. पियुषा जाधव तर बाल स्वागताध्यक्ष म्हणून अमळनेरची दिक्षा सरदार

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्ताने दि. १ फेब्रुवारी रोजी “बालमेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख च्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बाल उद्घाटक म्हणून रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी कु. पियुषा गिरीष जाधव तर बाल स्वागताध्यक्ष म्हणून डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर ची विद्यार्थीनी कु. दिक्षा राजरत्न सरदार ची निवड झाली आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार आहेत. या कलानंद बाल मेळाव्यासाठी बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी प्रताप तत्वज्ञान मंदिर, अमळनेर येथे कार्यशाळा पार पडली. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेनंतर बाल संमेलनाध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल स्वागताध्यक्ष नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी शुभम देशमुख, पियुषा जाधव, दिक्षा सरदार यांची नावे जाहीर करण्यात आली.

विद्यार्थीच सांभाळणार सर्व कामांच्या जबाबदाऱ्या…

बालमेळाव्यात सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थीच सांभाळणार आहेत. त्या जबाबदाऱ्यांचे वाटप या कार्यशाळेत करण्यात आले. यात सुत्रसंचालन : भाविका वाल्हे, निधी पवार, समृध्दीराजे पाटील, आकांक्षा पाटील, नेहा पाटील. प्रास्ताविक : डॅफोडील सोनवणे, मृणाल पवार, अजिंक्य सोनवणे, रिचल पाटील. अतिथी परिचय : जिगाशा महाजन, हिमांशू राजपूत, मृणाल पाटील, देवयानी साळूंखे. आभार प्रदर्शन : जिज्ञासा पाटील, कृष्णा पवार, मनस्वी पाटील, नेहा पाटील, सुमित पाटील तसेच अश्विनी पाटील, मानव पाटील, लोकेश पाटील, संजना नेरकर, तनय पाटील, कृतिका साळूंखे यांच्याकडे व्यासपीठ व्यवस्थापन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना २० व २४ जानेवारी रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील तर व्यासपीठावर कलानंद बालमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, एस. डी. देशमुख, कृपाली पाटील, प्रा. पी. टी. धर्माधिकारी, गिरीश चौक उपस्थित होते. प्रास्ताविकात संदीप घोरपडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. बालमेळाव्यात कार्यक्रम कसा सादर करावा या विषयावर प्रा. धर्माधिकारी, सुत्रसंचालन कसे करावे यावर गिरिष चौक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री देशमुख, कृपाली पाटील व विलास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक, बाल स्वागताध्यक्ष यांच्या नावांची घोषणा केली. सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!