स्पार्क इरिगेशन व सप्तशृंगी इरिगेशन यांच्या दातृत्वातून रोपे उपलब्ध

अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूल येथे बारा फूट उंचीचे १०० वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचे शुभहस्ते, तर ग्रामविकास शिक्षण संस्था मूडी चे अध्यक्ष उदय नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत धमके, स्पार्क इरिगेशन प्रा.लिमिटेड जळगाव चे संचालक रवींद्र लढ्ढा, सप्तशृंगी इरिगेशन अमळनेर चे संचालक बापूराव महाजन, संस्थेचे सचिव प्रा.भरत पाटील, जळगाव येथील उद्योजक महेश जडिए व इंजि. कुणाल गिरासे उपस्थित होते.
स्पार्क इरिगेशन व सप्तशृंगी इरिगेशन यांच्या दातृत्वाने १२ फूट उंचीची शंभर रोपे उपलब्ध झाली. यात.. वड, पिंपळ, निंब, बकुळ, कदम ची झाडे आहेत. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचे शुभहस्ते वृक्ष पूजनाने कार्यक्रमास सुरुवात केली. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तीन झाडे दत्तक देण्यात आली. जो विद्यार्थी दत्तक घेतलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित रित्या करेल व पाणी घालेल अशा विद्यार्थ्याला पुढील वर्षी म्हणजे दहावीला बोर्डाची फी गावातील दातृत्वातून भरली जाणार आहे. झाडाची पूर्ण वाढ करणाऱ्या विद्यार्थ्याला वृक्षमित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल असेही आश्वासित केले.
मनोगत व्यक्त करताना तहसीलदार रुपेश कुमार सुराणा म्हणाले की, एक झाड आपल्याला सावली देते, मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देते, शिवाय वातावरणातील दूषित वायू शोषून घेण्याचे कार्य करते. म्हणून प्रत्येकाने झाड लावणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. डी.ए.धनगर म्हणाले की, वसुंधरा सुद्धा शोक करायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांनी वसुंधरा शोक गीत अर्थ सांगितला. हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे असे सांगून उपस्थितांमध्ये झाडांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमास गावचे सरपंच गोविंदा सोनवणे, नारायण पाटील, काळू पाटील, वसंतराव पाटील, दिलीप पाटील सर, योजना पाटील, पुंजू पाटील, विजय बोरसे, संतोष बोरसे, अतुल सोनवणे, दिलीप पाटील, रामलाल पाटील, डॉ. के पी पाटील, सुप्रिया पाटील, यशवंत बैसाणे, नगराज पाटील, नंदकुमार अहिरे, विजय पवार, अंकित सोनवणे, रजनीकांत पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देशमुख मॅडम यांनी तर आभार निकम सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
