विमान कंपनीने घेतली शैक्षणिक सहलीची दखल

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक सहलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. सहल जर थेट विमानातून असेल, तर तो अनुभव आयुष्यभरासाठी स्मरणात राहतो. असाच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम अमळनेर शहरातील साने गुरुजी शाळेतर्फे राबविण्यात आला. साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतर्फे यंदा प्रथमच ‘जळगाव ते हैदराबाद’ विमान प्रवासासह शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विमानातून सहलीचे आयोजन करण्यात आल्याने, सहली साठी विद्यार्थी आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. साहजिकच दोन टप्प्यात सहलीचे आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २४ ते २८ फेब्रुवारी या काळात तर दुसऱ्या टप्प्यातील सहल ४ ते ८ मार्च दरम्यान संपन्न झाली होती. सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी विमान प्रवासाचा थरार आणि आनंद अनुभवला.
जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ (Fly91) विमानाने विद्यार्थ्यांनी हैदराबादसाठी उड्डाण केले. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे कुतूहल आणि उत्साह पाहायला मिळाला. विमानतळावरील प्रक्रिया, सुरक्षितता, तपासणी आणि प्रत्यक्ष उड्डाण या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी जवळून अनुभव घेतला. हैदराबादमध्ये पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळांना भेटी दिल्या. त्यात चारमिनार आणि गोलकोंडा किल्ला येथील भव्य स्थापत्यकला आणि इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच सालार जंग म्युझियम मधील विविध कलावस्तू आणि प्राचीन वारसा पाहून विद्यार्थी थक्क झाले. तर नेहरू प्राणी संग्रहालयातील विविध प्राणी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करून जैवविविधतेचा अभ्यास केला. याशिवाय हुसेन सागर येथे बोट सफारीचा तर लुंबिनी पार्क मधील लेझर शोचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. रामोजी फिल्म सिटीत चित्रपटातील दृश्य कसे चित्रित केले जाते ? पडद्यावर ते कसे दाखवले जाते ? याची जुजबी माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्याना रील आणि रियल मधील फरक समजला.
- विमान कंपनीकडून कौतुक…
- या ‘फ्लाय ९१’ (Fly91) या विमान कंपनीने या शैक्षणिक सहलीची दखल घेत जळगाव विमानतळावर विद्यार्थ्यांचा सामूहिक फोटो काढून सहलीचा आनंद द्विगुणित केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकार केल्याबद्दल, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत करत प्रत्येक विद्यार्थ्यांना काॅमिक्स भेट दिली. त्यांच्यासोबतचे हे संस्मरणीय क्षण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले आहे. शाळेने ग्रामीण भागातील मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे विमान प्रवासाचे नियोजन करून, विद्यार्थ्यांना आधुनिक जगाचा अनुभव दिल्याबद्दल विमान कंपनीने शाळा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
शाळेच्या शिक्षकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शैक्षणिक सहली चे नियोजन केले होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना केवळ वर्गात शिक्षण न देता त्यांना बाह्य जगाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आपल्या संस्कृतीचा अनुभव मिळावा, यासाठी शाळेतर्फे दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. सहलीचे नियोजन संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ, आणि मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मनोज पाटील, महेंद्र रामोशे, पंडित क्षीरसागर, मोनिका पाटील, मालती पवार, कोळी सर, राहुल पाटील, मगरे सर, सूर्यकांत पाटील, सुनीता मॅडम व सुवर्णा मॅडम यांनी केले.