अमळनेर : येथील सिंधी कॉलनीजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवित असतांना भीषण अपघात झाला. चोपड्याहून काही वाहने अमळनेरकडे येतांना समोरून चोपड्याकडे जाणा-या मालवाहू ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याने यात सुमारे १२ जण जखमी झालेत. मालवाहू ट्रक चालक उत्तर प्रदेशचा असून तो दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवित होता.
याबाबत वृत्त असे की, चोपडा रस्त्यावर सिंधी कॉलनीजवळ अमळनेरकडे जाणा-या वाहनांना त्यात पॅजो रिक्शा, ट्रॅक्टर, कार या वाहनांना चोपड्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्र.एनएल ०१ अेबी ४७६९ ने जोरदार धडक दिल्याने सुमारे १२ जण जखमी झाले. त्यात पॅजो रिक्षातील ९ जण जखमी झाले आहेत. याशिवाय अमळनेर येथील रहिवासी तथा कामतवाडी गांवचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांच्या आई, पत्नी ज्योती, मुलगा साई हे कारमधील जखमींची नावे आहेत त्यांना तात्काळ डॉ.सुमित सूर्यवंशी यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले रूग्ण हे नगांव बुद्रुक व अमळनेर येथील आहेत. दरम्यान, काही रुग्णांना धुळे येथे तर काहींना अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुुुसार, अपघातात पॅजो रिक्षातील योगेश रमेश पाटील (वय ३५ ), भटाबाई दिलीप पाटील (वय ५०), ज्ञानेश्वर विनायक पाटील वय (३८), वंदनाबाई राजाराम पाटील (वय४०), विनायक कौतिक पाटील (वय८०), राजाराम विनायक पाटील (वय ४०), सर्व (रा.नगांव बुद्रुक) हे जखमी झाले आहेत.

